"सामाजिक संस्थांच्या मागे आर्थिक पाठबळ उभं करा" चंद्रकांतदादा पाटील

DNS Bank    20-Feb-2018


"सामाजिक संस्थांच्या मागे आर्थिक पाठबळ उभं करा" चंद्रकांतदादा पाटील.

डोंबिवली : "अनेक संस्था आज समाजासाठी चांगले काम करत आहेत. या संस्थांना आर्थिक पाठबळाची आवश्यकता आहे. प्रत्येकाने क्षमतेप्रमाणे आपल्या उत्पन्नातील वाटा या सामाजिक संस्थांना अर्पण केला पाहिजे, " असे आग्रही प्रतिपादन राज्याचे महसूल मंत्री मा. ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी येथे काढले.

" डोंबिवली बँकेने योजलेल्या अनुदान वितरण व पुरस्कार प्रदान सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. " सरकार राजाश्रय देईल परंतू आर्थिक मदत करायला मर्यादा आहेत. आज पैसे उपलब्ध करू शकणा-या उद्योगांचीही वानवा नाही, अशा उद्योजकांना योग्य संस्थांपर्यंत पोचविण्याची आवश्यकता आहे. ते काम डोंबिवली बँकेने करावं," अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. " अरविंदरावांसारख्या ऋषीतुल्य व्यक्तीला पुरस्कार देण्याचं भाग्य मिळाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं. त्याचप्रमाणे आपल्या भाषणात त्यांनी डोंबिवली बँकेच्या सातत्यपूर्ण प्रगतीबद्दल बँकेचे अभिनंदन केले. तसेच वैशिष्ठ्यरित्या काम करणा-या काही संस्थांच्या कामाची उदाहरणेही दिली.

या वर्षीचा सहकार मित्र पुरस्कार जनता सहकारी बँक, पुणे चे माजी अध्यक्ष मा अरविंदराव खळदकर यांना प्रदान करण्यात आला. पुरस्काराचे स्वरूप ₹ ५१,०००/- रोख, मानपत्र व बँकेचे सन्मान चिन्ह असे होते.

आपले मनोगत व्यक्त करताना अरविंदराव म्हणाले, " मी हा पुरस्कार बँकेचे निष्ठावान सेवक, संयमी सभासद व खातेदार तसेच धाडसी संचालक मंडळ यांना अर्पण करतो आहे. स्वभावाच्याविरूध्द परंतू प्रामाणिकपणे काम करत राहीले तर नियतीही तुम्हाला साथ देते असेही प्रत्ययाला आले. केवळ त्यामुळेच जनता बँकेला गतवैभव प्राप्त झाले आहे. " असेही त्यांनी निक्षून सांगितले.

या वर्षीचा समाजमित्र पुरस्कार वयम् या जव्हार, मोखाडा भागात आदिवासी भागात नेतृत्व विकास व लोकशाही बद्दल समाजाभिमुख जनजागृतीचे कार्य करणा-या सामाजिक संस्थेला प्रदान करण्यात आला. 
₹ १,००,०००/- रोख, मानपत्र व बँकेचे सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. " आपले हक्क मिळवण्यासाठी मोर्चा काढायची आवश्यकता नसते, तर कायद्याचा वापर करून हक्क मिळवता येतो अशी जागृती वयम् चळवळीने केली आहे. माहितीचा अधिकार, रोजगार हमी योजना, ग्रामसभा इत्यादी गोष्टींबद्दलची जागरूकता पाड्या पाड्यांवर होत आहे आणि हेच चळवळीचं यश आहे." असे प्रतिपादन वयम् चळवळीचे विश्वस्त मिलिंद थत्ते यांनी व्यक्त केले. वयम् संस्थेचे कार्यवाह व ग्राम पंचायत विकास आराखड्यात शासन मान्य प्रशिक्षक श्री प्रकाश बरफ, वयम् च्या पूर्णवेळ कार्यकर्त्या प्रेमाताई खिरारी, व युवा विस्तारक श्री. भास्कर चिभडे, हे कार्यकर्ते याप्रसंगी उपस्थित होते.

आजचे दोन्ही पुरस्कार ऋषीतुल्य योध्दा व्यक्तींना प्रदान करताना अत्यंत समाधान वाटते आहे. अशी भावना बँकेचे मा. अध्यक्ष उदय कर्वे यांनी आपल्या प्रास्तविकात व्यक्त केली.

या कार्यक्रमात सामाजिक, सांस्कृतिक, वैद्यकीय, क्रिडा क्षेत्रात उत्तम कामगिरी करणा-या ११७ संस्थांना ₹ २५/- लाखांचे अनुदान वितरण करण्यात आले.

मानपत्रांचे वाचन, मा. संचालिका सौ. पूर्वा पेंढरकर व मा.संचालक श्री. मिलिंद आरोलकर यांनी केले. सहकार गीत सौ. कृतिका केतकर यांनी म्हटले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. नम्रता सावंत यांनी केले.

कार्यक्रमास बँकेचे आजी-माजी संचालक तसेच विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.